Thursday, 9 November 2017

अफजलखानाचा वध




शिवप्रताप दिन -10 नोव्हेंबर

तो आला नव्हता त्याला आणला होता , तो मेला नव्हता त्याला मारला होता.

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला.  वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजी महाराजांनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. अफजलखानाच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी  सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या.अफजलखानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.


शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली. 

 भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता  व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे  हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महाले (संकपाळ) यांनी आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण  करायचे आदेश दिले. मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले. दुसर्‍या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण  त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले.  शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.

पुढील १५ दिवसात शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला.


-----------------------------------------
संकलन - ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर जि. सोलापूर.
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा



Wednesday, 7 June 2017

छत्रपती शिवराय आणि शेतकरी...

ब्रिटीश व्यापार्यांची राजापूरला वखार
होती. त्यांनी तेथील व्यापार्यांना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे
खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता
माल दुसर्या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना
पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती
शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क
बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती
शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब खलिता पाठवला, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर तयार आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या
शेतकर्यांची जी हानी केली ती भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या. आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्यांकडून आली की, मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्यांना गाठून त्यांच्यामार्फत सर्व शेतकर्यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासोबत हानीभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले..
राजा असावा तर असाच...!!!

Saturday, 3 June 2017

मराठा साम्राज्यातील सुवर्णपान शुरवीर दत्ताजी शिंदे…..



 

इतिहासाच्या काळोखात लुप्त झालेल्या आणि निधड्या छातीवर गानिमांचे वार झेलून आपल्या पिढीसाठी जे शूरवीर लढले अशा मावळ्यांसाठी, अशा विरांविषयी विषयी अजून बरेच लिखाण व्हायला हवे होते परंतु तेवढे नाही ही खंताचीच बाब ..
अशाच वीरांपैकी एक शूरवीर ज्यांनी त्यांच्या अतुलनीय साहसाने, पराक्रमाने कायम माझ्या मनात घर केलेले आहे असे मर्द मराठा वीर म्हणजे “शूरवीर दत्ताजी शिंदे”


“भीषण अन भयाण अशा काळ्या रात्रीत कुठतरी धूसर चांदण पडल्यामुळे गीलच्यांना फक्त एकमेकांची तोंड दिसत होती..
लांबच लांब अशा पडलेल्या खाश्या डेर्यापैकी एका शाही डेर्यातून कुजबुज सुरु होती, गुप्त मसलत घडत होती, मराठा साम्राज्यावर चालून आलेल्या त्या अब्दाली नामक राक्षसाला या शाही डेऱ्यात जो तो मस्का मारण्यामध्ये अजिबात कुचराई करत नव्हता..
आणि यामध्ये आघाडीवर होता तो नजीब, तसेच कुतुबशाह…. बऱ्याच चर्चेअंती नजीबाने अब्दालीला ताबडतोब मराठा छावण्यावरती हमला करण्यासाठी मनधरणी करून तयार केलेच..  त्याची हातभार खोटीखोटी प्रशंसा देखील केली..
मल्हारबाबा अजूनही दत्ताजी पर्यंत पोचलेच नव्हते, अन मल्हारबा येईपर्यंत निशाणाला धक्काही लागू द्यायचा नव्हता असा जणू दत्ताजी शिंद्यांनी प्रतिज्ञाच केली होती, पण या मराठा भूमीवर धडकलेल्या दुश्मनाला, या काळ्या सापाला, म्हणजे नजीबाला मात्र दत्ताजी तसेच शिंद्याच्या फौजेला गाठून त्यांचा खातमा करावयाचा मनसुबा होता..
चर्चा संपता संपता बादशाहने हुकुम सोडला कि “सुरज कि पहिली रोशनी के साथ अपनी एक फौज यमुना पार करेगी और उसे नजीब और कुतुबशहा संभालेंगे”
नजीबाच्या अंगाअंगात लाडू फुटू लागले.. झोप तर जवळजवळ डोळ्यातून उडूनच गेली होती.. कधी पहाट होते आणि कधी या मरगठ्यांच्या चिंधड्या चिंधड्या करतो अशी त्याची अवस्था झाली होती..
यमुनेच्या दुसऱ्या तीरावरती जानराव बावळे आपल्या चार हजाराच्या फौजेसह बुराडी घाटाचे रक्षण करत होता, पहाटेची वेळ आणि बोचरी थंडी अंगाला झोंबत होती.. समोरून येत असलेल्या महाभयानक संकटाची त्याला चाहूलही नव्हती..
यमुनेचे पाणीही थोडे आटल्याने बुराडी घाट आज वेगळाच भासत होता, हळूहळू उन वर चढू लागली आणि ९ वाजण्याचा सुमार झाला असेल नसेल तेव्हढ्यात २-४ रावतांनी अक्षरशः कर्कश आवाजात गलका केला..गोंगाट करून ओरडू लागले..
“उठा……उठा….. गिलचे आले……गनीम आले…. उठा……उठा…..”
कावरेबावरे झालेल्या जानराव बावळ्यान्नी नजर रोखून पहिले तर गनिमांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या, जानराव सावध पवित्रा घेत म्हणाले
“चला.. उठारं..   बोला…… हर हर महादेव…. हाना… मारा…. माग सरू नगासा”
समद्या रावतांना जणू चेव चढला आणि बंदुका आग ओकू लागल्या.. तलवारी तळपू लागल्या…. गीलच्यांनीही मग जम्बुरक्यामधून आगी धडाडन्यास सुरुवात केली.. बंदुकीतून गोळ्यांचा जणू वर्षाव सुरु केला….
अफगाणांचा असंख्य फौजफाटा पाहून जानरावांनी कुमकीसाठी दत्ताजीकडे टाकोटाक स्वार पाठीवले..
ही खबर मिळताच दत्ताजी शिंद्याच्या अंगाअंगातून वीज सळसळून गेली…. जणू काही दत्ताजी या क्षणाची वाट पहात होते..
विलंब न करता दत्ताजींनी ३ तुकड्या केल्या अन आपल्या आवडत्या अन सजवलेल्या लालमणीवरून रणांगनाकडे टाच मारली.. हातात तळपती तलवार….
लालमणीचा लगाम खेचत अन हर हर महादेव चा गजर करत दत्ताजी अन मराठा सैन्य विजेच्या त्वेषाने रणांगणाकढे झेपाऊ लागल.. गिलच्यांच्या नरडी कधी फोडणार अन त्या नरडीचा घोट कधी घेतो या नुसत्या कल्पनेने मराठे झेपावत होते…. अंगाअंगावर रोमांच फुलात होते..
हा हा म्हणता काही वेळातच दोन्ही फौजा एकमेकाला भिडल्या, नुसता हाहाकार माजला..  अफगानाकडे जशा बंदुका होत्या, जशी शस्त्रे होती त्याच्या तोडीस मराठ्यांकडे होत्या फक्त तळपत्या तलवारी… यामुळे काही वेळातच घाटात रूप पार पालटून गेले….
मराठ्याकडे बंदुका जवळजवळ नव्हत्याच, त्यामुळे अर्थातच मराठ्यांच्या रक्ताचा पाट वाहू लागला.. मराठ्यांच्या मुडद्याचे ढीग दिसू लागले.. कुणाचा बाप मेला कुणाच्या पोराने तडफडत समोर जीव सोडला, कुणाचा काका तर कुणाचा चुलता.. पण याचे भान होतेच कुणाला ? दिसत होती ती फक्त अफगाणी घुबडे अन त्यांच्या मुंड्या… काही वेळातच मराठ्यांच्या हाडामासाचा नुसता चिखल दिसू लागला.. मराठ्यांच्या सळसळनाऱ्या रक्ताचे नुसते पाट वाहू लागले, त्या रक्तातून ही अफगाणी घुबड पळत होती… त्या रक्तावरून घसरत होती… जगदंब ! जगदंब !
अशी पडझड चालल्याची भयंकर खबर दत्ताजी पर्यंत पोचते न पोचते तोच कमी कि काय म्हणून आणखी २ धक्कादायक खबरी येऊन धडकल्या…. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्याच्या राशीत बेपत्ता झाले आहेत अन उरल्यासुरल्या फौजेनिशी बुराडी घाटाकडे माघारा फिरत आहेत…. अन दुसरी म्हणजे  गनिमांनी एकाच वेळेत तिन्ही बाजूंनी हमला केला आहे..
रणमदाने बेहोष झालेला दत्ताजी शिंदे लालमनीवर स्वार झाला, लालमणी थुईथुई नाचू लागला, मर्द मराठा जवान वीर, शिरावर शिरस्त्राण, पाठीवर ढाल, हातात तळपती तलवार असा दत्ताजी चा रणमर्दाचा अवतार पाहून मराठ्यांना नव-स्फुरण चढले..
“हर हर महादेव” चा जयघोष करत या मर्दाने जणू काळावर झेपावे तसा लालमणी गनिमांवर घातला..
तलवारीच्या घावासरशी मुघली घुबडांचे मस्तक उडवू लागला.. बिनामुंडक्याच्या धडातून रक्ताची चिळकांडी उडत होती..
उडालेल्या मुंडक्याचा खच दिसत होता तसे मराठे बंदुकीलाही घाबरेना झाले अन आपसूक मुघली बंदुकीच्या टप्प्यात येऊ लागले.. हळूहळू मराठे निपचित पडून दिसेनासे होऊ लागले.. तसा दत्ताजीच्या जवळ येऊन तानाजी खराडे म्हणाला
“बाबा पडती बाजू झालिया.. कुनीबी दिसना गेलया, निशाण गुंडाळाव अन निघावं”
हे ऐकताच दत्ताजी जणू कडाडलाच….
”या रणांगणासाठीच अन या दिसासाठीच तर माझा जन्म आहे, दत्ताजी यमासमोर देखील उभा टाकील मग ह्या घुबडांना पाठ दाखवू ? शक्य नाही “
इतका वेळ निशाणापाशी झुंजत असलेला जनकोजी दंडावर गोळी लागल्याने घोड्यावरून खाली कोसळला, कुणीतरी घाबरून अन ते भयावह दृश्य पाहून  दत्ताजींना म्हणाले
“बाबा, घात झाला….जनकोजीबाबा ठार झाले”
दत्ताजींच्या कानाच्या पाळ्या तप्त झाल्या, बाहू स्फुरण पावू लागले, अंगातले रक्त लाव्ह्याप्रमाणे उसळू लागले.. जगदंबे आज तुझे भुत्ये इथे राक्षसाचे मर्दन करणारच या भावनेने अन सुडाने दत्ताजी नुसता धगधगत होता… रागाने लालबुंद झालेला दत्ताजी हातात तलवार घेऊन पुढे झेपावत होता..
एव्हड्यात डोळ्यासमोर हलकट नजीब दिसताक्षणी क्षणाचाही विलंब न लावता हातातील समशेर उंच उडवत “हर हर महादेव…. जय भवानी” च्या जयघोषात दत्ताजी आवेशाने नजीबाकडे झेपाऊ लागला आणि वाटेतल्या अफगानावर तुटून पडला.. समशेरीच्या दणक्यासरशी अफगाणी माकडांची मुंडकी उडवू लागला, सपासप बरगडीत तलवार घुसवू लागला..
इतक्यात अचानक एक जम्बुऱ्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीस छेदून लालमणीवर धडकला तसा दत्ताजी खाली पडला.. निपचित पडलेल्या आपल्या प्रिय लालमणी कढे पाहू लागला….
नजीबाला अन कुतुबशहाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले.. दोन्ही सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले..
दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे”
मराठा वीराची ही जिद्द, ही डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा कुत्र्यासारखा दत्ताजींच्या अंगावर बसला अन हातातल्या खंजिराने दत्ताजींच्या छातीची चाळणी करू लागला.. अंदाधुंद खंजीर छातीत घुसवू लागला..  अशातच अंगात संचारलेल्या हैवानासारखा नजीब हे दृश्य पाहून बेभान झाला अन झटक्यात हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला अन दत्ताजीची मान धडावेगळी केली.. दत्ताजीची मान खाली पडली तरीही चेहऱ्यावरचे ते सूर्यासारखे तेज अन डोळ्यातील अंगार पाहून नजीब आणखीन चेताळला..
दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने पूर्ण माखत माखत थंड पडू लागला..
या हरामखोर नजीबाने जवळच्या एका रोहील्याच्या हातातला भाला हिसकावून घेतला अन दत्ताजीचे मुंडके हातात घेऊन भाला त्यात खसकन खुपसला.. अन तो भाला हवेत उडवू लागला…..
आणि तसाच बेधुंद झालेला नजीब पळणाऱ्या मराठ्यांना अभय द्यायचे सोडून पाठलाग करून कत्तल करण्याचा आदेश देऊन तो मुंडके खोवलेला भाला घेऊन नाचत नाचत अब्दालीकडे निघून गेला…..
बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले…. नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली…. अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला…. हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..
आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला…. पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला……
अशा नरपुत्राला, रणमर्दाला, मर्द मराठ्याला, सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला, आम्हां तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा…
“दत्ताजी शिंदे आमचा जीव जाईल… कदाचित चंद्रतारेही नष्ट होतील…… परंतु आपल्या अतुलनीय अनाकलनीय साहसाला बलाढ्य पराक्रमाला हा बुराडी घाटच काय पण आम्ही असंख्य मावळे आम्ही मराठे कधीही विसरू शकणार नाही”


ऋषिकेश सुदर्शन शिंदे.
पंढरपूर जि. सोलापूर

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा


शिवसह्याद्री  Android App 
Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 
Like करा

Friday, 2 June 2017

म्या शेतकरी बोलतोय !!!

शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हा आवाज सर्वत्र घुमतोय..म्हणूनच आज मी माझं मनोगत मांडतोय...मला माहित आहे माझा आवाज  शासन दरबारी पोहचणार नाही. कारण, त्यासाठी काही राजकीय संघटनांनी बांधणी केली आहे  (आता हि बांधणी खरंच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कि भविष्यात येणाऱ्या निवडणूकांसाठी हे येणारा काळच ठरवेल)....
शेतकऱ्यांची कर्जमाफ व्हावी कि नाही?

 या बद्दल मी मत मांडत नाही....परंतु जी सल मनाला नेहमी टोचते ती मांडतोय...

व्हय म्या शेतकरी बोलतोय!!

होय आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे वाटतात .... 
पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल उधळणाऱ्या एसयूव्ही कार बाईक उडवाव्या वाटतात .... 

त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे वाटते. 

उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे गुन्हा आहे काय ? 

टाटा, अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर द्यावा. आमची अंत:करणे जळत नाहीत का ? 

बाईक , कार, बस, रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत.

आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का ?

जरा सर्दी खोकला झाला कि सुपर स्पेशालिटीत दाखल होणाऱ्याना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत.... मात्र कांदा कडू लागतो. 
पेट्रोल/डीझेल कितीही महागले तरी ब्र नसतो... भाजीपाला स्वस्त पाहिजे... 

तुमच्या एक वेळच्या शावर आंघोळीत आमच्या कांद्याचे दोन वाफे भिजू शकले असते. ऐन उन्हाळ्यात शेतीचे पाणी रोखून शहराला पाणी पुरवले गेले तेव्हा किती जणांनी आपले शावर बंद केले .... 

उन्हाळ्यात एक रात्री कुलर पन्नास लिटर पाणी फस्त करते..... तेवढ्यात ठीबकवर मोसंबीची चार झाडे जगू शकली असती.. किती जणांनी कुलर वापरणे थांबवले.... 

एक एसी तीन एचपी पावर ओढतो... तेवढ्यात। एका शेतकऱ्याचे शेत भिजवता येते .... झाला का एसीचा वापर बंद ? .... शेतीला मिळणारी वीज इकडे वळवल्यामुळे चाळीस वर्षापूर्वीची तेलावर चालणारी इंजिने खेड्यात टूकटूक करताना दिसत आहेत...कारण सोळा सोळा तास वीजच नसते...! 

का नाही होणार शेतमाल महाग ... ? खेड्यात वीजच नसते तर कुठला टीव्ही अन संगणक ? पंखा, कुलर तर विचारातच घ्यायचे नाही ..!

का आम्ही सावत्र आईची लेकरे आहोत ? दिवाळीत शहरे विषारी दारूच्या धुराने ओसंडून वाहतात आणि आमच्या पोरांना साध्या टिकल्या उडवत बसावे लागते...

 काय त्यांनी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतल्याचे पाप केले म्हणून ?

त्यांना नाही वाटत कानाचे पडदे फाडणारे फटाके फोडावेत म्हणून...? 

शेतकऱ्यांच्या किडन्या फेल होत नाहीत ?

त्यांना हृद्यविकाराचे झटके येत नाहीत ? 

सरकारी इस्पितळात डुकरासारखे भरती होताना त्यांना अपमान वाटत नाही ?

कुठून येतील महागड्या उपचारासाठी पैसे ? 

तुमच्या कुत्र्यांना मिळतात तसले वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांच्या गाई, बैलाला सोडा या माणसांनाही मिळू नयेत ?

कुठून येईल हा पैसा ? उन्हाळ्यात तुम्ही आठ दहा दिवस सकुटुंब सहलीला जाऊन लाखभर रुपये खर्च करून यावेत... आणि त्यांनी फक्त वारीत पायपीट करून पर्यटनाचा आनंद मानावा ? एक दिवसाची सुटी टाकून स्वातंत्र्यदिन विकेंडला जोडून चार दिवसांची मौज मजा करणारांना माहित आहे का कधी शेतकऱ्यांनी साजरा केलेला विकेंड ! त्यांचा स्वातंत्र्यदिन बैलाबरोबर शेतात साजरा होतो..!

जर आम्हा येड्या मुक्याना काहीच स्वप्ने नसतात असे समजत असाल तर एक दिवस शेतकऱ्यांची पोरे नक्षलवादी म्हणून भरती व्हायला लागलेली दिसतील. स्वातंत्र्यदिना च्या पूर्वसंध्येला कांदा हाच जीवनमरणाचा प्रश्न झालेल्या मित्रांनो भानावर या .... ! 

भारत पाक क्रिकेटमॅच असेल तर पाक कडून सीमेवर मारल्या गेलेल्या जवानांचे स्मरण करायला आम्हाला फुरसत नसते..! 

हे आमचे देशप्रेम !... 

म्हणे

जय जवान ... जय किसान.

Thursday, 1 June 2017

क्रांतिवीर उमाजी नाईक

 जन्म : ७ सप्टेंबर १७९१ 

मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२

भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

३ फेब्रुवारी हा या आद्यक्रांतीकाराचा स्मृतिदिन रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.

क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.

'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?
तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.

त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीरकामठी, गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख ही जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.
आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या अधिपत्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरी च्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.

उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.

१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता. 

फोटो : नेट साभार

अधिक माहितीसाठी

खालील apps Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

 शिवसह्याद्री  Android App 

Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 

Like करा

संत तुकाराम :अध्यात्माचा कळस

ण्याजवळ देहू येथे मोरे कुळातील आंबिले घराण्यात वडील बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई यांचे पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शु. ५ शके १५३०. त्यांचा पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. तसेच या घराण्याकडे देहू गावाची महाजनकीही होती. या घराण्याचे मूळपुरुष विश्वंभर (इ. स. चे चौदावे शतक) हे विठ्ठलाचे उपासक होते, त्याने आपल्या घराजवळच विठ्ठलाचे मंदिर बांधले होते. त्यामुळे विश्वंभरापासून बोल्होबापर्यंत विठ्ठलभक्तीचा वारसा त्या घरात अविच्छिन्न चालत आला होता.अशा भक्तियुक्त वातावरणात वाढलेल्या तुकारामांच्या मनावर बाळपणापासूनच शुभ संस्कार घडले. ‘विठ्ठल कुळीचे दैवत’ किंवा ‘पंढरीची वारी आहे माझे घरीं’ अशा उक्तींतून या परंपरागत संस्कारांचा तुकाराम महाराजांनी अभिमानाने उल्लेख केला आहे. ‘शुद्ध बीजापोटीं । फळें रसाळ गोमटीं’ हे त्याचे वचन त्यांच्या बाबतीत पूर्णपणे लागू पडते. महाजनकीच्या वृत्तीमुळे लिहिणे व वाचणे ते लहानपणीच शिकले. संस्कृताचाही परिचय करून घेतला होता. कथा-कीर्तनांतूनआणि भजनांतून सतत कानी येणा-या संतवाणीने ते बहुश्रुत बनले होते. सदाचाराची बैठक ढळू न देताव्यवहार कसा करावा, हे त्यांना घरीच शिकायला मिळाले होते.इ. स. १६३० च्या सुमारास सर्वत्र मोठा दुष्काळ पडला आणि लोकांची दुरवस्था झाली. या परिस्थितीत तुकारामाचे मनअंतर्मुख बनू लागले. त्याचे भक्तिसंस्कार जागे झाले आणि 

‘विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुस-यांचे काज’ या निश्चयाने भक्तिसुख अनुभविण्यासाठी त्याने घरचे विठ्ठलमंदिर दुरुस्त केले. या विपरीत काळात वित्त व जीवित यांची असारता प्रत्ययाला आल्यामुळे त्याची वृत्ती संसारातून मुरडली आणि विठ्ठलचरणी स्थिरावू लागली. पुढे मोक्षाची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या भामनाथ पर्वतावरील एकांतात ईश्वरसाक्षात्कारासाठी निर्वाण मांडले. तिथे पंधरा दिवसपर्यंत अखंड एकाग्रतेने नामस्मरण केल्यानंतर त्यांना 

‘दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । 

तैसा देह जाला तुका म्हणे’ 

अशा प्रकारचा दिव्य अनुभव प्राप्त झाला. या एकांताताली चिंतनाच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव व एकनाथ यांच्या अभंगगाथा आणि इतर अनेक संतांची वचने यांचा सखोल अभ्यास केला, या स्थितीत पुनश्च धनाचा मोह उत्पन्न होऊ नये, म्हणून त्याने निग्रहपूर्वक आपल्या सावकारीच्या सर्व वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या.त्या वेळी छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य-प्रयत्न नुकतेच सुरू झाले होते. साधुसंतांविषयी स्वभावतःच प्रीती बाळगणा-या महाराजांनी तुकाराम महाराजांचेही दर्शन घेतले व मागाहून भेटीदाखल बरेच द्रव्य त्याच्या घरी पाठविले. परंतु त्या निरिच्छ व निर्लोभ संताने ते द्रव्य जसेच्या तसे परत पाठविले. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी लोकांच्या मनातील अविवेकाची काजळी झटकण्यासाठी लोकांना नाना प्रकारे उपदेश केला. ‘बुडती हे जन देखवेना डोळां’ अशी तळमळ त्याने अनेकवार व्यक्त केली आहे. या तळमळीतूनच कधी मातेच्या ममतेने, तर कधी पित्याच्या कठोरतेने लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड संत कवी होते. वेदान्तासारखा क्लिष्ट विषय तुकोबांच्या अभंगवाणीतूनसामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्यासांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. आपले वाङ्मयधन हे लोकधानाच्या पदवीला नेऊन पोचविण्याचे भाग्य तुकाराम महाराजांना विशेष लाभलेले आहे. तुकारामांची अभंगवाणी ही गेल्या तीनशे वर्षांच्या काळात महाराष्ट्रवाणीचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे.तुकारामांच्या अभंगांतील किती तरी चरण, अर्धचरण, शब्दप्रयोग, कल्पना व भाषाप्रयोग मराठी माणसाच्या हरघडीच्या बोली भाषेत अवतरले आहेत. मोजक्या शब्दांत केवळ खूपसा अर्थ, खरेतर विश्वव्यापक अनुभव व्यक्त करण्याची शक्ती तर त्या वाणीमध्ये आहेच – शिवाय छंदोबद्ध असल्यामुळे तिला सुभाषितासारखी तालबद्धताही प्राप्त झाली आहे. मराठी भक्तिपरंपरेत आणि कविमंडळातही तुकारामाचे स्थान अनन्यसाधारण आहे. ‘अणुरणीया थोकडा’ म्हणणारे तुकाराम महाराज विवेकबळाने आकाशाएवढे बनले आणि ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया रचला, त्या भागवतधर्म मंदिरावरचा कळस होऊनशोभत राहिले व राहतील. शके १५७१ फाल्गुन वद्य २, चे दिवशी सदेह वैकुंठाला जाण्याचे भाग्य या थोर संताला लाभले.

संत  तुकाराम महाराजांची गाथा  Download करा

कर्तव्यप्रिय महाराणी ताराबाई

ताराबाई किंवा ताराराणी ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या व राजाराम महाराज यांच्या पत्नी होय. औरंगजेब नावाचे वादळ हे १६८१ साली स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला त्या औरंग्यास संभाजीराजे यांनी योग्यप्रकारे उत्तर दिले पण कपटाने संभाजीराजास पकडून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यानंतर ह्या लढ्याची जबाबदारी पडली राजाराम महाराजांवर! त्यांनी हरप्रकारे मुघलांना तोंड दिले आणि सळो की पळो करून सोडले. पण दुर्दैव! राजाराम महाराजांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले आणि ह्या हिमालयासारख्या संकटाचे नेतृत्व ताराबाई यांनी केले.

राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्य चालाविण्याची जबाबदारी ताराबाईंवर येउन पडली. आपल्या पतीच्या हयातीतच ह्या स्त्रीने राज्यकारभारात व लष्करी मोहिमात भाग घेण्यास सुरुवात केली होती. मोगली इतिहासकार खाफीखान म्हणतो,"ताराबाई ही राजारामाची बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा फार मोठा लौकिक होता." ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी (दुसरा) यास गादीवर बसवून राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. मराठे औरंगजेबाशी युद्ध खेळत होते, पण औरंगजेबाचे प्रचंड सामर्थ्य येथे अपुरे पडत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची बाजू कमजोर झाली असे बादशहास वाटले पण ताराबाईंनी धैर्याने व हुशारीने बाजू सावरली.

त्या विधवा तरुण राणीने औरंगजेबासारख्या मुरब्बी सम्राटाशी युद्ध खेळून अपराजित राहणे म्हणजे हे तिचे कर्तुत्व बोलते. औरंगजेबाचे लष्करी व राजकीय सामर्थ्य प्रचंड होते. मल्हाररामराव म्हणतो,"औरंगजेब बादशहासारखा शत्रू. लाखो फौज. खजिना बेमुबलक छकड्यास-छकडा द्रव्याचे भरोन कोटीशाबरोबर चालत आहेत." अशा मोठ्या साम्राज्याशी महाराष्ट्र टक्कर घेत होता. लष्करी युद्धव्यवस्था,द्रव्य इत्यादी बाबतीत मराठे मोगलांशी बरोबरी करु शकत नव्हते, तरीदेखील त्यांनी मुघलांचे जगणे नकोसे करून टाकले. मुघल- मराठा संघर्षात मोगली नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. उलट मराठ्यांच्या नेतृत्वात तीन वेळा बदल झाला. संभाजीराजे, राजाराम महाराज व ताराबाई ह्या नेतृत्वाच्या तीन पिढ्या महाराष्ट्राने बघितल्या.
ताराबाई ह्या मराठ्यांच्या नाममात्र राज्यकर्त्या नव्हता. मराठ्यांच्या राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती. याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या करीत होत्या. त्यांच्या राज्यकारभार कौशल्याविषयी व लष्करी नेतृत्वाविषयी खाफीखान म्हणतो,"रामराजाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडविली. तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली." सरदारांच्या नेमणुका,त्यांच्या बदल्या,राज्याचा कारभार,बादशाही मुलुखांवरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. ताराबाईंनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की सिरोंज,मंदसोर,माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत धामधूम उडविली.
बादशहाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालविली. ताराबाईशी तो शेवटपर्यंत लढला पण मराठ्यांचे बळ व बंड ही देवसेंदिवस वाढत गेले. तत्कालीन मराठी कवी गोविंद याने ताराबाईंच्या पराक्रमाचे सार्थ वर्णन केले आहे:- 

"दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||

ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |

खचो लागली तेवि मते | कुरणेही खंडली ||

रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |

प्रलयाची वेळ झाली | मुगलहो सांभाळा ||"

महाराष्ट्रातील जनतेला युद्धाबद्दल आत्मीयता नसती आणि त्यात भाग घेतला नसता तर हे मराठ्यांचे राज्य यावनी झाले असते. मराठ्यांनी खूप मोठा लढा देउन स्वतःचे राज्य राखले.

संदर्भ:-

छत्रपती राजाराम ताराराणी:- सदाशिव शिवदे

महाराणी ताराबाई:- जयसिंगराव पवार

चिटणीस बखर

मराठ्यांचा इतिहास खंड १

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...