Friday, 22 May 2020
शिवराज्य
Sunday, 29 April 2018
नरवीर शिवा काशीद
वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा न्हावी आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.
Thursday, 9 November 2017
अफजलखानाचा वध
भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महाले (संकपाळ) यांनी आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले. मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्यांवर आक्रमण केले. दुसर्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.
श्रीशिवराज्याभिषेक
रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...
-
तळोदा येथील बारगळ गढी हि 360 वर्ष जूनी आहे हिचे बांधकाम भोजराज बारगळ यांनी 1662 साली लावले होते हे काम एकूण 7 वर्ष चालले होते या गढिचा 8 फुट...
-
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म...
-
रोज सकाळी पेपर उघडला कि,पहिली बातमी दिसते कि खून, बलात्कार, चोरी, दरोडा, आत्महत्या अशीच, आणि आता ते इतका सवयीचा झालाय कि बहुतांश लोक अशा बात...

